जें वेदांसी नातुडे श्रुतींसी सांकडें । ते उभे वांडेंकांडें पंढरीये ॥१॥
न माये चराचरीं योगियांच्या ध्याना । तया म्हणती कान्हा नंदाचा जो ॥२॥
आगम निगम लाजोनी राहिले । तया बांधिती वहिलें उखळासी ॥३॥
काळाचा जो काळ भक्ता प्रतिपाळ । तया भेडविती बागुल आला म्हणोनी ॥४॥
बारा चौदा सोळा अठरा विवादती । तो गायी राखी प्रीती गोकुळांत ॥५॥
एका जनार्दनीं भक्तीचा भुकाळू । खाय तुळसीदळू भाविकांचें ॥६॥