सर्वांगी सुवास परि तो उगला न राहे । सभोंवतें तरुवर चंदन करिताचि जाये ॥१॥
धणी धाय परी परी त्याची भुक्ति न धाये । सागर भरिता परी त्या सरिता समाये ॥२॥
वैरागर मणी पुर्ण तेजाचा होय । सभोंवतेम हारळ हिरे करिताचि जाय ॥३॥
एका जनार्दनीं पुर्ण जालासे निज । आपणासारिखें परीं तें करितसे दुजें ॥४॥