जन्म कोट्यांनीं हरिसेवा जोडे । नवविद्या भजन सांग घडे । तंव वैराग्य तें पाहें पुढें । पूर्व प्राचीन फळ रोकडें ॥१॥
ऐसें तैंच मिळती ते साधु । ज्यांचा संग करी उद्धोधु । ज्यांचा स्पर्श करी आल्हादु । ज्यांचा महिमा न कळे आनंदु ॥२॥
घडे काम कर्म परित्याग । झडे समुळ विषयांचा संग । सर्व कामना नुरे मुसमार्ग । तैं आतुडे मानवा संतसंग ॥३॥
शुद्ध सत्वगुण देहीं पाहें । दंभ अहंकार मानापमान जाये । कामक्रोध लोभ सांदी सोये । तैं भूतभाव नाहीं होय ॥४॥
जैं जनार्दनीं शुद्धभाव । स्वकर्मासी विश्रांती ठाव । ऐक्य दुजे दोन्हीं होती वाव । देहबुद्धीच भासे देव ॥५॥
जैं संतदया होय बापा । तैंचि विश्रांती त्रिविध तापा । तैंचि मिळणी होय स्वरुपा । पूर्ण एका जनार्दनीं कृपा ॥६॥