संत ज्ञानेश्वर विराणी / विरहिणी / विरहरत्ने १ – विरह वेदना

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
पडलें दूर देशी मज आठवे मानसीं ।
नको नको हा वियोग, कष्ट होताति जिवासी ॥ १ ॥
दिनु तैसी रजनी जालिगे माये ।
अवस्था लावूनी गेला, अझुनी का न ये ॥ २ ॥
गरुडवाहना गुणगंभिरा, येईगा दातारा ।
बापरखुमादेविवरा, श्रीविठ्ठला ॥ ३ ॥

आपण बघतो की काही माणसे वरकरणी क्षुल्लक दिसणाऱ्या घटनांमुळे अस्वस्थ होतात तर काही महाभयानक आपत्तींमुळेसुध्दा विचलित होत नाहीत. एखाद्या अनुभवाने आपणास सुख झाले आहे वा दुःख होत आहे याचे ज्ञान होण्यास दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे मनाच्या पटावर घडलेल्या घटनेची प्रतिमा उमटण्यास मोकळी जागा असणे जरुरी आहे. स्वतःच्या नादात रमलेल्या माणसाच्या समोरुन लग्नाची सुंदर वरात गेली तरी त्याला त्याची जाणीव होत नाही! परंतु नुसते प्रतिबिंब उमटून चालत नाही. दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे त्या मोकळ्या जागेत जे काही उमटलेले आहे त्या चित्राची जाणीव व्हायला हवी. एखादे बालक प्रत्येक पक्ष्याला ‘काऊ’ वा ‘चिऊ’ असे संबोधिते आणि अचानक एखाद्या सुंदर पक्ष्याच्या दर्शनाचा आनंद झाला तरी त्या आनंदाचे वर्णन करु शकत नाही. तेव्हा आपल्या जवळ पूर्वानुभवांचा मुबलक साठा असणेसुध्दा भावनांना नीट ओळखण्यास जरुरी आहे.

आता या पार्श्वभूमीवर बघा की संतांच्या मनात आधीच्या सर्व जन्मांतील अनुभवांचे ज्ञान असते. उदाहरणार्थ, माउलींनी श्रीज्ञानेश्वरीत असे स्पष्टपणे म्हटले आहे की ‘माझिया सत्यवादाचे तप । वाचा केले बहुत कल्प । तया फळाचे हे महाद्वीप । पातलो प्रभु ॥ ३२:१६॥’ आणि त्याचबरोबर ते सतत वर्तमानकाळात जगत असल्याने त्यांचे मनःपटल संपूर्ण मोकळे आहे. त्यामुळे त्यांच्या मनात समोरील घटनांचे जे पडसाद उमटत असतील त्याची कल्पना आपणासारख्यांना होणे कसे शक्य आहे?!! आपल्यासारखे त्यांचे मन भौतिक पातळीवर नसते म्हणूनच ठीक आहे, नाहीतर भोवतालच्या प्रत्येक घटनेने ते हत्तीच्या चालण्याने जवळील मुंगी जशी हादरते तसे भावनांच्या वादळात सापडले असते. परंतु त्यांचे मन ज्या ठीकाणी असते तेथील सूक्ष्मातल्या सूक्ष्म हालचालीनेसुध्दा त्यांच्या जीवनात प्रचंड हेलकावे येतातच. आपले चित्त सतत भगवंताच्या चरणकमलांपाशी ठेवल्यामुळे भगवंताचा क्षणिक वियोगसुध्दा त्यांना जिवापाड वेदना देऊन जातो, जिवन उलटे-पालटे करुन जातो.

वरील अभंगामध्ये माउलींनी आपल्या आयुष्यातील अशाच एका नाजूक क्षणाचे वर्णन केले आहे. ते म्हणत आहेत: ‘तुझ्यापासून दूर गेल्याने तुझी आठवण मनात प्रकर्षाने येत आहे. हा वियोग अतिशय कष्टदायक असून मनापासून नकोसा वाटत आहे (१). हे करुणासागर माते, मला आता दिवस रात्रीसारखा वाटत आहे (माझे सर्व जिवन उध्वस्त झाले आहे), ही अवस्था झालेली असतानासुध्दा तू अजून का येत नाहीस? (भक्‍ताच्या आर्त हाकेला तात्काळ धावून येण्याच्या ब्रीदाची आठवण ठेवून माउली भगवंतांना अशी हाक देत आहे!) (२). अरे सर्वगुणसंपन्न असलेल्या गरुडा, तू भगवंतांचे वाहन आहेस तर आता तू तरी उदार हो आणि माझ्यापाशी श्रीविठ्ठलांना घेऊन ये (३).’

बघा, माउलींचे मन विरहवेदनेने किती वेडेपिसे झालेले आहे! जो गरुड भगवंतांच्या आज्ञेशिवाय आपले पाय पुढे ठेवित नाही अशा सेवकाला जबरदस्तीने भगवंताला आपणाजवळ आण अशी विनवणी करण्यास ते तयार झाले आहेत. जेव्हा मनाची अवस्था केविलवाणी झालेली असते तेव्हा ‘बुडत्याला काडीचा आधार’ या न्यायाने आपण कितीही अशक्य असलेल्या गोष्टींचा आधार घेतो तशीच अवस्था प्रत्यक्ष माउलींची झालेली आहे. श्रीसंत तुकाराम महाराजसुध्दा आपल्या ‘गरुडाचे पायी, ठेवी वेळोवेळां डोई’ या अभंगामध्ये गरुडाला, लक्ष्मीला आणि शेषाला विनवणी करतात की तुम्ही तरी भगवंताला माझ्याजवळ आणा. संतांच्या या सकृतदर्शनी विरोधाभासी वर्तनावरुन ते किती व्याकुळ झाले असतील याची थोडीफार कल्पना करण्याचा प्रयत्‍न आपण करु शकतो. आपल्या हातात एवढेच आहे कारण त्यांच्या मनःस्थितीची आपणास जाणीव होणे निव्वळ अशक्य आहे!

शेवटी या अभंगाकडे बघताना एक गोष्ट लक्षात घ्या की माउलींना झालेली विरहवेदना आपल्या दृष्टीने एक क्षणभरही टिकलेली नसणार. परंतु त्यांच्या मनाच्या पराकोटीच्या संवेदनशीलतेमुळे तो अत्यल्पकाळसुध्दा त्यांना नकोसा वाटतो. दुःखाचे मोजमाप ते कितीकाळ टिकले यावर करायचे नसते, तर त्याने मनात किती खोल जखम झाली आहे यावर करायचे असते हे आपण नजरेआड करु नये.

॥ हरि ॐ ॥

संत ज्ञानेश्वर विराणी १


संत ज्ञानेश्वर विराणी / विरहिणी / विरहरत्ने २ – पुनर्भेटीची उत्कंठा

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकूनगे माये सांगताहे ॥ १ ॥
उडरे उडरे काऊ, तुझे सोन्याने मढविन पाहु ।
पाहुणे पंढरीराऊ घरा कैं येती ॥ २ ॥
दहिभाताची उंडी लाविन तुझ्या तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥ ३ ॥
दुधे भरुनी वाटी लावीन तुझे वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥ ४ ॥
आंबयां डाहाळी फळे चुंबी रसाळी ।
आजिचेरे काळीं शकुन सांगे ॥ ५ ॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे ।
भेटती पंढरीराणे शकुन सांगे ॥ ६ ॥

संतांचे भगवंताशी तादात्म्य झालेले असते. तरीसुध्दा जगाच्या उध्दारासाठी ते स्वतःला भौतिक पातळीवर ठेवतात. भगवंताने त्यांना तशी आज्ञाच केलेली असते. उदाहरणार्थ, श्री रामकृष्ण परमहंस जेव्हा निर्विकल्प समाधिचा आनंद लुटत होते तेव्हा काही काळ गेल्यावर त्यांना काली मातेने आज्ञा केली की ‘तू आता भावमुखी अवस्थेत रहा. तुझे शिष्य होणार आहेत त्यांना शिकविण्यासाठी तुला निर्विकल्प समाधीचा त्याग करायला हवा.’ नंतर श्री स्वामी विवेकानंदांनाही श्री रामकृष्ण परमहंसांनी असेच सांगितले की ‘समाधी लावून स्वतःच्या आनंदात मग्न रहाणे म्हणजे संकुचित वृत्ती आहे. तुला जगभर हिंडयचे आहे हे विसरु नकोस.’ संतांच्या जिवनाकडे बघताना आपण ही गोष्ट सतत लक्षात ठेवली पाहीजे. या दृष्टिकोनातून बघितल्यास जेव्हा संत समाजात वावरत असतात तेव्हा ते मानसिकरीत्या विरहावस्थेमध्येच असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याचेच एक उदाहरण बघा: हिमालयामध्ये श्री स्वामी रामा म्हणून एक थोर योगी नुकतेच होऊन गेले त्यांची प्रसिध्दी जगभर पसरलेली आहे. त्यांचे गुरु म्हणजे श्री बंगाली बाबा एकदा हिमालयात एका गुहेत ध्यान करीत असताना त्यांना भेटायला एक राजा आला आणि त्याने विचारले इथे बसून तुम्हाला एकटेपणाची भावना येत नाही का? तेव्हा ते लगेच म्हणाले की ‘तू नव्हतास तेव्हा मी एकटा नव्हतो आणि तू बोलायला लागल्यावर एकटेपणा वाटू लागला आहे.’ त्यातून त्यांना असे सांगायचे होते की ज्या भगवंताबरोबर माझे सान्निध्य होते तो आता तुझ्याशी बोलत असल्याने निघून गेला आहे. अर्थात, इथे काही सुजाण वाचक असा संदेह निर्माण करतील की सर्वभूतांमध्ये त्यांना भगवान दिसत असल्यास ते असे कसे म्हणू शकतात? त्यांच्यात विरहावस्था कशी निर्माण होणार? यावर उत्तर असे आहे की सर्व भूतांमध्ये भगवान आहेच पण त्यांच्या उपजत स्वभावांमुळे त्यांच्यामधील भगवंताचे रुप झाकले गेलेले आहे. उदाहरणार्थ, पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीमधील भगवान अगदी उघडपणे डोळ्यासमोर दिसतो तितका शेजारच्या कुटुंबातील पाळलेल्या श्वानातील दिसत नाही. त्यामुळे संतांना भगवंताचे निर्मल, आवरणाहीन रुप बघण्याची उत्सुकता कायम असतेच. तीच त्यांची विरहावस्था होय.

एकदा अशाच अवस्थेत श्री ज्ञानेश्वर माउली असताना त्यांना पलिकडून एका कावळ्याचे ओरडणे ऐकू आले. त्याच्या वरकरणी कर्कश्य वाटणाऱ्या कावकावीतून त्यांना काय वाटले याचे वर्णन त्यांनी वरील अभंगात केले आहे. ते म्हणत आहेत की: ‘(माझ्या मनाची व्याकुळता बघून) पलीकडील कावळा मला ओरडून सांगत आहे की मी तुला शुभ वार्ता सांगायलाच इथे आलो आहे (१). अरे कावळ्या, आता तुझा शकुन पूर्ण करण्यासाठी जरुरी असलेले उडून जाणे लवकर कर. तू असे केलेस तर ज्याप्रमाणे एखादा राजा शुभवार्ता आणणाऱ्याला गळ्यातील मोल्यवान हार काढून देत असे, त्याचप्रमाणे मी तुला संपूर्ण सोन्याने मढवून टाकीन कारण तू पंढरीराणे विठोबा घरात केव्हा येणार आहेत याची वार्ता सांगितली आहेस! (२) पण उडून जायच्या आधी जरा थांब, तू ‘त्यांच्याकडून’ आलेला असल्याने उडायच्या आधी मला विठोबारायांबद्दल जरा सांग बघू. ते कसे आहेत, केव्हा येणार आहेत वगैरे गोष्टी मला सांगितल्यास तर तुला आवडणारा दहि-भात मी तुला प्रेमाने भरवीन (३) आणि ही घे दूधाने भरलेली वाटी पण मला खरं सांग रे! माझा विठोबा येणार ना रे?!! (४) आज तू दारच्या आंब्याच्या झाडावर असल्यापैकी सर्वात रसाळ फळांना खाल्लेस तरी मी तुला काहीही बोलणार नाही पण शकुन पूर्ण करण्यात आता दिरंगाई करु नकोस आणि आत्ताच तो पूर्ण कर. (५) ओ हो! मला आत्ता कळले की कावळ्याचा शकुन पूर्ण झाला आहे आणि त्याने माझा पंढरीराया मला आजच भेटणार आहे याबद्दल माझी पूर्ण खात्री झालेली आहे!! (६)’

विठोबाशी तादात्म्य साधण्यासाठी माउली इतकी उत्सुक आहे की त्यामुळे कावळ्यासारख्या अतिसामान्य जीवालासुध्दा अत्यंत आदराने संबिधिले जात आहे. कारण सेवक कितीही छोटा असला तरी तो ज्या मालकाची सेवा करीत आहे त्यानुसार श्रेष्ठ होतो!! आणि आलेला कावळा प्रत्यक्ष विठोबांच्या आज्ञेने आलेला असल्यामुळे ते अत्यंत प्रेमाने त्याला ‘काउ’ असे संबोधून त्याचा मानसन्मान करीत आहेत! यावरुन आपण असा बोध घ्यायला हवा की जर आपणास माउलींचे प्रेम पूर्णरुपाने हवे असेल तर आपल्या मनात विठोबाबद्दलची भक्‍ती जागृत असायला हवी. जिथे वैष्णवांच्या मेळा असतो तिथे माउली येणारच येणार. वारीतील प्रत्येक वारकऱ्याला या सत्याची प्रचीति आलेली आहे!!!

॥ हरि ॐ ॥

संत ज्ञानेश्वर विराणी २


संत ज्ञानेश्वर विराणी / विरहिणी / विरहरत्ने ३ – पूर्वभेटीची आठवण

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
अवचिता परिमळु झुळकला अळुमाळू । मी म्हणे गोपाळु आलागे माये ।
चांचरती चांचरती बाहेरी निघालें । ठकचि मी ठेलें काय करु ॥ १ ॥
मज करा का उपचारु अधिक ताप भारु । सखिये सारंगधरु भेटवा का ॥ ध्रु. ॥
तों सावळा सुंदरु कासे पीतांबरु । लावण्य मनोहरु देखियेला ।
भरलिया दृष्टी जंव डोळा न्याहाळी । तव कोठे वनमाळी गेलागे माये ॥ २ ॥
बोधोनि ठेले मन तंव जालें अने आन । सोकोनि घेतले प्राण माझेगे माये ।
बापरखुमादेविवरु विठ्ठल सुखाचा । तेणें कायामनेंवाचा वेधियेलें ॥ ३ ॥

एखाद्या व्यक्‍तीपासून दूर गेल्यावरच तीच्याबद्दल आपणास किती प्रेम आहे याची खरी जाणीव होते. आपणास आवडणारे व्यक्‍तिमत्व बरोबर असले की जिवनात प्रसन्नता असते आणि सहवासाच्या आनंदाने आपले मन भरुन जाते हे जरी खरे असले तरी आपल्या मनाला सध्यापेक्षा अधिक परिपूर्ण आनंद शोधायचा एक चाळा असतोच. म्हणूनच आपण बघतो की आपल्या सद्‌गुरुंना सोडून कित्येक साधक गुरुआज्ञेविना आपणहुन तीर्थक्षेत्री जाऊन साधना करायचा प्रयत्‍न करीतात. भले भलेसुध्दा यातून सुटलेले नाहीत. जेव्हा श्री रामकृष्ण परमहंसांना घशाचा कर्करोग झाला होता तेव्हा स्वामी विवेकानंद काही काळ बुध्दगयेला साधना करण्यास गेले होते. कल्पना करा की जी शक्‍ति राम आणि कृष्ण या रुपाने भूतलावर अवतरली होती तीला सोडून स्वामी दुसरीकडे गेले होते!! श्री स्वामी समर्थांच्या शिष्यांतही हीच गोष्ट आपणास वारंवार बघायला मिळते. मायेचा पगडा असा अगम्य आहे. त्यामुळे आपणासारखे साधक सद्‌गुरुंचा उत्सव चालू असताना मध्येच एक दिवस काढून जवळील देवस्थानांना भेट द्यायला जातात यात काय नवल?!! परंतु ज्याप्रमाणे झोपी गेलेल्या माणसाच्या तोंडावर गार पाण्याचा हबका बसला की तो खडबडून जागा होतो त्याचप्रमाणे विरहवेदना जाणविली की साधक इतर गोष्टींच्या मायापाशातून सुटून परत आपल्या सद्‌गुरुंच्या चरणापाशी येतो. अशा रीतीने विरहामध्येही सकारात्मक भावना आहेच!

या सृष्टीतील प्रत्येक वस्तूत सत्व, रज आणि तम या तिन्ही गोष्टी अस्तित्वात असतात. त्यामुळे विरहासारख्या अधिकांश तामसिक गोष्टीतही सद्‌गुरुंच्या तीव्र आठवणीची सात्विकता आहेच. त्या सत्‌स्मरणामध्ये एकाग्रतेने मग्न असताना आपले मन अतिशय ताणलेल्या तंतुवाद्यासारखे तरल होते आणि त्यामुळे अत्यंत क्षुल्लक गोष्टीही आपणास अनिवार आनंद वा दारुण दुःख देऊन जातात. याचे एक उदाहरण म्हणजे ज्या ग्रामातील मातीपासून भगवंताच्या भजनासाठी वापरणारा घट बनतो त्या गांवाचे नाव काढल्यावरच श्री रामकृष्ण परमहंस अतिउच्च भावावस्थेमध्ये विरुन जायचे. कारण त्यांच्या मनात त्या नामोच्चरणाने तो घट आणि त्याच्या अनुषंगाने भजन-कीर्तन यायचे आणि ते त्या स्मरणात समाधिस्थ व्हायचे. त्यांची मनःस्थिती कायमच अशी अत्यंत नाजूक असल्याने भोजनसमयी चुकूनसुध्दा कुणी दुरान्वयाने भगवंताची आठवण होईल असे शब्द काढले तरी ते भावावस्थेत विलीन व्हायचे आणि त्यांचे भोजन तसेच रहायचे. केवळ श्री शारदामाताच त्यांना पूर्ण भोजन करण्यास भाग पाडू शकायच्या. अशी अतिउच्च भावावस्था विरहाचाच एक भाग आहे. वरील अभंगामध्ये माउलींची अवस्था अशीच असल्याचे आपणास स्पष्टपणे दिसून येते.

माउली म्हणत आहे: ‘कुठून तरी अचानक चंदनाचा सुगंध आल्याचा मला भास झाला आहे. नक्कीच देवकीनंदन गोपाळ मला भेटायला आला असणार. त्या भेटीच्या कल्पनेनेच माझे देहभान हरपल्यासारखे झाले पण मी स्वतःला कशीबशी सांभाळत त्याला भेटायला बाहेर आले तर माझे बघणेच खुंटल्यासारखे झाले आहे. आता मी काय करु हे सुचेनासे झाले आहे (१). सख्यांनो, माझा विरहज्वर अधिक प्रज्वलित होण्याआधी यावरचा एकच उपाय जो आहे तो म्हणजे मुरलीधराची भेट ती मला लवकरात लवकर घडवा (ध्रु.) मला त्याचे पीतांबर नेसलेले लावण्यमयी मनोहर सावळे रुप दिसले आणि मला दृष्टी आहे याचे सार्थक झाले. परंतु चित्त समाधान झाल्यावर त्याला परत एकदा नीट पहावे म्हणून बघायला गेले तर तो कुठे अदृष्य झाला हे कळलेच नाही (२). त्या दर्शनाने माझे मन उन्मन झाले आहे आणि माझ्या संकुचित व्यक्तिमत्वाचा पूर्ण नाश झाला आहे. आता मला निव्वळ विठ्ठलाच्या स्मरणातच सुख लाभायला लागले आहे. त्यातच मी आता कायावाचामनाने पूर्णतः गुंतलो आहे (३).’

बघा, कुठून तरी सुगंधाचा भास होण्याचे निमित्त काय झाले आणि माउली भावावस्थेत विलीन झाल्या! परंतु या देहातीत अवस्थेतही अतिशय सुंदर शब्दांत माउलींनी फार गहन तत्व मांडले आहे. भगवंताशी भेट झाल्यावर जी अवस्था होते तीचे वर्णन करायला गेल्यास ती कुठे नाहीशी होते हे कळतच नाही असे माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणत आहे. ‘दृष्टी भरल्यावर डोळ्यांनी बघायला गेले तर तो नाहीसा झाला’ या अतिनाजूक आणि समर्पक शब्दांतून भगवंताला बुध्दीने जाणणे अशक्य आहे हे माउलींशिवाय कोण मांडू शकेल काय?! खरोखर, माउलींच्या रुपाने इतकी अफाट ज्ञानी आणि त्याबरोबर अकल्पानप्य वाक्‌कौशल्यता व अमर्याद सौंदर्यदृष्टी असलेली व्यक्‍ती या भूतलावर कधीतरी वावरली आहे या जाणीवेनेच मन भरुन येते. अशावेळी अभंग ऐकणाऱ्यांच्या नयनांतून अश्रुधारा न वाहतील तरच नवल. भगवंताबद्दल अभंगातील भावनेच्या एक लक्षांश भावना तरी आपल्या जिवनात येऊदे अशी माउलींच्या चरणी प्रार्थना!

॥ हरि ॐ ॥

संत ज्ञानेश्वर विराणी ३


संत ज्ञानेश्वर विराणी / विरहिणी / विरहरत्ने ४ – विरहाग्नीचा दाह

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा ।
भवतारकु हा कान्हा । वेगी भेटवा कां ॥ १ ॥
चांदवो वो चांदणे । चापेवो चंदनु ।
देवकी नंदनु । विण नावडे वो ॥ २ ॥
चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी ।
कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा गा ॥ ३ ॥
सुमनाची सेज । सीतळ वो निकी ।
पोळी आगीसारिखी । वेगीं विझवा गा ॥ ४ ॥
तुम्ही गातसां सुस्वरे । ऐकोनि द्यावी उत्तरे ।
कोकिळें वर्जावें । तुम्ही बाइयांनो ॥ ५ ॥
दर्पणी पाहातां । रुप न दिसे वो आपुलें ।
बापरखुमादेविवर विठ्ठलें । मज ऐसे केलें ॥ ६ ॥

कलकत्ता शहरानजीक असलेल्या दक्षिणेश्वर येथील श्री कालीमातेच्या देवळात साधना करीत असताना श्री रामकृष्ण परमहंसांना एक विचित्र आजार झाला. त्यांनी स्वतः त्यांच्या प्रिय शिष्यांना या आजाराचे वर्णन करीताना असे सांगितले की ‘त्यावेळी सर्व शरीर आगीने पोळल्यासारखे उष्ण होऊन अतिशय वेदना जाणवायच्या. त्या वेदना दररोज सूर्य उगवायच्या सुमारास दाह सुरू होऊन माध्यान्हीपर्यंत पेलवण्यास अशक्यप्राय होतील इतक्या वाढायच्या. अशावेळी गंगेच्या पाण्यात शरीर बुडविल्याशिवाय काहीच गत्यंतर नसायचे. परंतु फारकाळ पाण्यात राहील्याने दुसरे आजार बळावतील या भितीने त्यांना बाहेर यावे लागावयाचे. मग एका संगमरवरी फरश्या असलेल्या खोलीत सर्व दारे खिडक्या बंद करुन व ती जमिन फडक्याने ओली करुन ते त्यावर गडबडा लोळायचे. तरीसुध्दा अंगाचा दाह कमी व्हायचा नाही!’ त्यांचे त्याकाळचे परमभक्‍त म्हणजे श्री माथुरबाबू. दक्षिणेश्वर मंदिराची मालकीण श्री राणी रासमणी यांचे ते जावई. त्यांनी ठाकुरांचा ‘रोग’ बरा व्हावा म्हणून बरेच प्रयत्‍न केले. त्याकाळचे प्रख्यात वैद्य बोलावून नाना तऱ्हेची दुर्मिळ औषधे आणली तरी हा रोग बरा होईना. नेमक्या याच सुमारास दक्षिणेश्वरामध्ये एक संन्यासिनी आली. भैरवी ब्राह्मणी नाव असलेल्या या संन्यासिनीने पुढे श्री रामकृष्णांना तांत्रिक विद्या पूर्ण शिकविली. श्री रामकृष्णांना बघितल्यावर तिने सांगितले की ‘ही अवस्था कुठल्याही रोगाने झालेली नसून भगवंताच्या विरहाने झालेली आहे. साधकाच्या भगवंताबद्दलच्या प्रेमाची पराकोटी झाली की अशी स्थिती होते आणि श्री राधा व भगवान श्री चैतन्यप्रभू यांच्या जीवनात ही वारंवार आल्याचे उल्लेख आहेत. हा ‘रोग’ बरा करण्याचा उपाय म्हणजे साधकाला गोड सुवासिक फुलांच्या माळा घालाव्या आणि शरीराला चंदनाच्या लेप लावावा.’ भैरवीच्या या बोलण्यावर अर्थात कुणाचाच विश्वास बसला नाही. इतके नामांकित वैद्य जे निदान करु शकले नाहीत त्याबद्दल ही संन्यासिनी कशी बोलू शकते असेच त्यांना वाटले. परंतु इतक्या उपायांमध्ये हा उपायसुध्दा करुन बघण्यात काय हरकत आहे असा विचार करुन त्यांनी सूचनेची अंमलबजावणी केली. गंमत म्हणजे फक्‍त तीन दिवसात श्री रामकृष्ण परमहंसांच्या देहाचा दाह संपूर्ण नाहीसा झाला! तरीसुध्दा लोकांनी आधी केलेल्या उपचारांचाच हा वेळाने झालेला परीणाम असणार, ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गांठ पडली’ असे म्हणून भैरवीवर विश्वास ठेवला नाहीच! अजूनही आपण बघतोच की आपल्या नेहमीच्या माहितीत असलेल्या आणि सहजतेने जवळ असलेल्या व्यक्‍तीमध्ये साधनेची इतकी पराकोटी झालेली आहे हे कोण मान्य करतो?!! असो.

वरील अभंगातही माउली विरहाग्नीच्या दाहाचे वर्णन करीत म्हणत आहे: ‘ढगांचा गडगडाट आणि त्याच्या बरोबर थंडगार वाऱ्याची झुळूक जाणविली, (आणि ज्याप्रमाणे अशा वातावरणात मयूराला मयूरीची तीव्र ओढ वाटते त्याचप्रमाणे मला वाटून) आता मला या जगाचे सर्वदुःख हरण करणारा कान्हा लवकर भेटवा (१). या देवकीनंदन गोपाळाविण मला ना रात्रीचे चांदणे शीतल वाटत आहे ना चंदनाचा लेप (२). चंदनाची चोळी करुन मला घातली तरी माझे सर्व अंग जळल्यासारखे होत आहे. तो दाह आता सहवेनासा होऊन यावर जो एकच उपाय आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे दर्शन ते मला घडवा (३). अगदी गोड सुवासिक फुलांच्या शय्येवर जरी मी झोपले तरी मला विस्तवावर पडल्यासारखे होत आहे. आता हा विरहाग्नी त्वरीत विझवा (४). मैत्रिणींनो, तुम्ही आपल्याच जीवनगाण्यात मग्न आहात परंतु माझे करुणास्वर ऐकून माझ्यासाठी काहीतरी करा. सख्यांनो, आता माझ्यासाठी तरी तुम्ही ऐहीक सुखाला त्यागा (म्हणजे भगवान तुम्हांकडे येईल आणि मग त्याला तुम्ही माझ्याकडे आणू शकाल!) (५). श्री विठ्ठलकृपेने मी कोण आहे, कुठे आहे, कशी आहे याचे सर्व भान सुटलेले आहे. स्वतःचे रुप पहायचा प्रयत्‍न केला तरी त्यात मला यश मिळत नाही (तेव्हा आता माझ्याकडून भगवंतप्राप्तीचे प्रयत्‍न होतील ही आशाच नाही. म्हणून सख्यांनो आता मला फक्‍त तुमचाच आधार आहे.) (६).

सांगायची गोष्ट अशी की माउलींनी आपल्या या विरहीणीमध्ये श्री रामकृष्ण परमहंसांच्या अवस्थेपेक्षाही दारुण अवस्था वर्णन केली आहे. भैरवी ब्राह्मणीने ठाकुरांच्या विरहज्वरावर जे यशस्वी उपाय केले होते, त्यांचाच उल्लेख करुन आता त्यांचासुध्दा काही उपयोग होत नाही असे माउली म्हणत आहे हे लक्षात घ्या. याचे कारण असे आहे की माउलींची विरहावस्था इतरांच्या भौतिक पातळीवरील अस्तित्वातच सुख शोधण्याच्या प्रयत्‍नांनी अधिकच वृध्दींगत झालेली आहे. परमदयाळू माउलींच्या कृपामय स्वभावामुळे आता आपल्या जीवनातील दुःखही त्यांचे झाले आहे. त्यामुळे निव्वळ त्यांच्या देहावर उपचार करुन त्यांची मनःशांति होत नाही तर जेव्हा आपण आपल्या जीवनात खरा आनंद निर्माण करु तेव्हाच त्यांचे खरे समाधान होणार आहे. सख्यांच्या रुपकाद्वारे माउली आपणा सर्वांना स्वतःचे जीवनगाणे बदलायला सांगत आहे. चला, आपण स्वतःच्या भगवंताजवळ जाण्याच्या साधनेला जोमाने सुरु करुन ‘भजिजो आदिपुरुखी अखंडित ॥’ अशा अवस्थेत राहण्याचा प्रयत्‍न करु. माउलींच्या विरहाचे निरसन करण्याचा आपल्यापरीने प्रयत्‍न करु!!

॥ हरि ॐ ॥

संत ज्ञानेश्वर विराणी ४


संत ज्ञानेश्वर विराणी / विरहिणी / विरहरत्ने ५ – सगुणरुपाचा ध्यास

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
ज्याचिये आवडी संसार त्यजिला ।
तेणे का अबोला धरिलागे माये ॥
पायां दिधली मिठी घातलीं जीवें गांठी ।
साउमा न ये जगजेठी उभा ठेला गे माये ॥ १ ॥
भेटवा वो त्यासी चरण झाडीन केशीं ।
सगुणरुपासि मी वो भाळलिये ॥ ध्रु. ॥
क्षेमालागीं जीऊ उतावेळ माझा ।
उचलोनि चारी भुजा देईन क्षेम ॥
कोण्या गुणें का वो रुसला गोवळु ।
सुखाचा चाबळु मजसी न करीगे माये ॥ २ ॥
ऐसें अवस्थेचे पिसें लाविलेसे कैसें ।
चित्त नेलें आपणियां सारिसेंगे माये ॥
बापरखुमादेविवरें लावियेले पिसें ।
करुनि ठेविले आपणिया ऐसेंगे माये ॥ ३ ॥

भगवंताच्या भेटीसाठी जीव उतावीळ झालेला असला आणि सात्विक वृत्तींची पूर्ण वृध्दी झालेली असली तरीसुध्दा ईष्टदेवतेचे दर्शन लगेच होते असे नाही. श्रीसंत नामदेवांना बालपणीच केवळ एका हट्‍टामध्येच श्रीविठोबांचे दर्शन झाले हा एक सन्माननीय अपवाद आहे असे दिसून येते. श्रीस्वामी स्वरुपानंदांनी असे म्हटले आहे की तब्बल दोन वर्षे त्यांना विष्णूंच्या चतुर्भुज अवताराची अनन्य आस सहन करावी लागली तेव्हा त्यांना सगुण रुपाचे दर्शन झाले. श्री रामकृष्ण परमहंसांच्या जीवनाकडे बघितले तरीसुध्दा असे दिसून येते की लहानपणीच त्यांना पूर्णपणे कळून चुकले होते की नामांकित पंडितसुध्दा आपल्या विद्येचा उपयोग शेवटी द्रव्य व सन्मान मिळविण्यासाठीच करीतात. या जाणीवेतून त्यांच्या मनात पुस्तकी ज्ञानाबद्दल पूर्ण उबग निर्माण झाला आणि भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे याबद्दल खात्री पटली. नंतर दैवयोगाने त्यांच्याकडे श्रीकालीमातेची पूजा करण्याचे काम चालून आले आणि त्यांच्या वैराग्यवृत्तीला अजूनच बळ आले. काही काळाने त्यांची अवस्था अशी झाली की ते देवीच्या दर्शनासाठी वेडेपिसे होऊन दिवसरात्र ‘तू कुठे आहेस?’ असे म्हणत फिरायचे. कपड्याची शुध्द नाही, दिवस आहे का रात्र आहे याचे भान नाही अशा अवस्थेत ते जमिनीवर गडबडा लोळून अजून तू मला का भेटत नाहीस? असे आर्तपणे विलाप करायचे. त्या वेड्या पुरोहिताचे वर्तन बघण्याऱ्यांची लोकांची मोठी गर्दी जमायची! ‘त्याकाळात मला एका भगवंताच्या ध्यासाशिवाय काहीही कळत नव्हते. भोवताली जमा झालेली माणसेसुध्दा अंधुक-अंधुकच दिसायची’ असे स्वस्थितीचे वर्णन त्यांनी नंतर केले होते. शेवटी एक दिवशी अजून मातेचे दर्शन झाले नसल्याने आता या जीवनाचा अंत करणेच योग्य आहे असे पक्के ठरवून त्यांनी श्रीकालीमातेच्या हातातील तलवार काढली व स्वतःचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्‍न केला तेव्हा प्रत्यक्ष कालीमातेने पुढे येऊन त्यांचा हात पकडला व दिव्य दर्शनाचा आनंद दिला. या व इतर कित्येक उदाहरणांवरुन असे दिसते की संतांच्या जीवनातही भगवंत लगेच येतो असे नाही. आपल्या प्रिय भक्‍तालाही दर्शनासाठी इतकी वाट बघायला लावण्यास भगवंताचा काय उद्देश्य असेल?!

माउलींच्या वरील विराणीमध्येही त्यांच्या भगवंतदर्शनाची आस दिसून येत आहे. काहीतरी प्रमाद घडल्यावर शिक्षा म्हणून प्रियकराने प्रेयसीशी अबोला धरल्यावर तिची जी अवस्था होते तो भाव मनात ठेऊन करुण स्वरात माउली म्हणत आहे: ‘ज्या भगवंताच्या गोडीने मी व्यावहारिक जगाचा त्याग केला त्याने का म्हणून माझ्याशी अबोला धरला आहे? स्वतःच्या व्यक्‍तिमत्वाला तिलांजली देऊन (जीवाला गाठ मारुन!)त्याच्या पायाला मी घट्‍ट मिठी घातली तरी तो आपल्याच ठिकाणी स्वस्थ उभा राहून माझ्यासमोर येण्याचे का टाळत आहे? (१) कुणीतरी त्याला मला भेटवा हो! त्याच्या चरणांची धूळ मी माझ्या केसांनी झाडायला तयार आहे, त्याच्या सगुणरुपाच्या ध्यासात मी विरुन गेले आहे (ध्रु.) त्याच्या भेटीसाठी माझा जीव अत्यंत उतावीळ झाला आहे. त्याच्या चारी भुजांनी मला आलिंगन दिले तरच मला सुख लाभणार आहे. मी काय केले म्हणून तो माझ्यावर रुसला आहे आणि त्यामुळे माझ्या सुखाला त्याने रोखून ठेवले आहे? (२) मी त्याच्या ध्यासात वेडी होऊन माझे सर्व चित्त त्याने व्यापून टाकले आहे. (भ्रमर-कीटक न्यायाने) त्याच्या सतत विचाराने मी आणि तो यातील फरकच आता मला कळेनासा झाला आहे आणि त्यातच सगुण दर्शनाची ओढ असल्याने (म्हणजे द्वैतामधील आनंद उपभोगायची इच्छा अजून असल्याने) मला वेड लागल्यासारीखे झाले आहे (३).’

संतांचा जन्म निव्वळ लोककल्याणासाठी झालेला असल्याने त्यांनी स्वतःसाठी काहीही मागणे करणे कदाचित भगवंताला पसंत नसावे. मग भले ती मागणी त्याच्या दर्शनाची का असेना! श्री रामकृष्ण परमहंसांच्या धर्मपत्‍नी म्हणजे श्री शारदामाता. त्यांनी त्यांच्या दक्षिणेश्वरामधील रहिवासाबद्दल असे सांगितले की ‘मी ठाकुरांच्या खोलीशेजारी असलेल्या इमारतीतील जिन्याच्या खाली जी छोटीशी जागा होती त्यात रहायचे आणि तिथेच दिवसभर त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांकरीता भोजन इत्यादी तयार करायचे. परंतु त्यांच्या इतक्या जवळ राहूनसुध्दा मला त्यांचे दर्शन कित्येक महिने व्हायचे नाही! दर्शनाची अगदीच उत्कट इच्छा झाली तर मी माझ्या खोलीच्या दाराला चटईचा पडदा होता त्याच्या एका बारीक छिद्रातून त्यांच्या पाठीकडे वा जवळ बसलेल्या एखाद्या शिष्याकडे बघून वा त्यांचा भजन गातानाचा आवाज ऐकून समाधान मानायचे.’ बघा म्हणजे ज्या रामकृष्णांना देवीच्या दर्शनाचा ध्यास लागला होता ते स्वतः भगवंतस्वरुप झाल्यावर त्यांचे दर्शनही दुर्मिळ झाले! ठाकुरांनी व श्री शारदामातांनी जे जीवन व्यतीत केले त्याच्या दिव्यपणाला तोड नाही. माउलींच्या विराणीतील सर्व भावांचे प्रत्यक्ष दर्शन या दैवी दंपतीच्या जीवनपटात वेळोवेळी दिसून येते! विराणीतील भाव निव्वळ कविकल्पना नसून त्यांची उत्कटता संतांनी प्रत्यक्षतेने भोगलेली आहे हे लक्षात घ्या.

॥ हरि ॐ ॥

संत ज्ञानेश्वर विराणी ५


संत ज्ञानेश्वर विराणी / विरहिणी / विरहरत्ने ६ – कृष्णाविण जीवनाचे शून्यत्व

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
कृष्णें वेधली विरहिणी बोले ।
चंद्रमा करीतो उबारा गे माये ।
न लावा चंदनु न घाला विंजणवारा ।
हरिविणे शून्य शेजारुगे माये ॥ १ ॥
माझे जीवींचे तुम्हीं का वो नेणा ।
माझा बळिया तो पंढरीराणा वो माये ॥ २ ॥
नंदनंदनु घडीघडी आणा ।
तयाविण न वचति प्राण वो माये ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु गोविंदु ।
अमृतपानगे माये ॥ ३ ॥

परमार्थामध्ये आपण सर्वजण फक्‍त एका शब्दाचा पूर्ण अर्थ समजण्याचा प्रयत्‍न करीत आहोत. प्रत्येकाचे मार्ग भिन्न असतील, पण सर्वांची मूळ जन्मजात जिज्ञासा एकच आहे. त्या शब्दांत न सांगता येणाऱ्या वा कितीतरी वेळा स्वतःलाच न जाणविलेल्या ओढीपोटीच आपल्यापैकी कुणी रामनाम घेत असेल, तर कुणी सोहम्‌ साधनेत मग्न असेल तर आणि कुणी योगसाधनेमध्ये व्यग्र असेल. कुणी हिंदु असेल तर कोण मुसलमान. कोणीतरी श्रीज्ञानेश्वरीचे पठण करीत असेल तर कोण दासबोधाचे तर अजून कुणी कुराणाचे. परंतु साधकांमधील सर्व फरक त्या एका शब्दाचा अर्थ शोधण्यातील मार्गांमधील फरक आहे. मूळ शब्द एकच आहे. तो म्हणजे ‘गुरुकृपा’. या कृपारुपी मधाचे बोट जिभेला लावूनच आपणास जन्म येतो आणि मग आयुष्यभर त्या चवीला शोधण्यात आपला जन्म जातो! ज्याला गुरुकृपा म्हणजे काय हे पूर्णपणे कळले तो साधक सिध्द झालेला आहे. या शब्दाचा अर्थ इतका गूढ आणि गहन आहे की तो पूर्ण कळण्यास आपली शब्दसंपत्ती संपूर्णरीत्या विकसित व्हावी लागते. श्रीज्ञानेश्वरी वा इतर संतसाहित्य नित्यवाचनात ठेवल्याचा फायदा असा की त्यातील शब्दांद्वारे आपण स्वस्थितीला जाणू शकतो. तेव्हढे शब्दभांडार जवळ नसले तर साधक नुसता ‘किती सुंदर’ या पलिकडे काही म्हणू शकत नाही किंवा एव्हढे शब्दसुध्दा त्याच्या तोंडातून न फुटता तो केवळ स्तब्ध राहून भावावस्थेत मग्न होतो. साधनेमधील ही एक अतिउच्च अवस्था आहे. अशावेळी भगवंतकृपेने आपले सद्‌गुरु मानवी रुपात अस्तित्वात असले तर त्यांच्या सहवासाची ओढ अनिवार होऊन साधकाला त्यांच्या दर्शनाची तळमळ लागते. आता ही तळमळ अध्यात्मिक पातळीवरील असली तरी ती मूर्तरुपात अवतरताना साधकाच्या साधनाप्रकारानुसार येते. त्यामुळे यशोदामातेला बाळकृष्णाची ओढ लागते तर सुदामाला आपल्या मित्राची. ज्याप्रमाणे जमिनीत खोल असलेला एकच झरा ठिकठिकाणी वेगळ्या कूपांतून बाहेर येतो आणि मग त्यांच्या आकारानुसार त्या जलाचे रुप होते त्याचप्रमाणे सर्व साधकांच्या मनातील एकाच अद्वैतानंदाचे दृष्य रुप विभिन्न होते.

वरील अभंगामध्ये माउलींनी भगवान श्रीकृष्णांची पूर्ण कृपा झालेल्या एका गोपीची अवस्था कथन केलेली आहे. भगवान श्रीकृष्णांना आपला सखा मानलेल्या गोपीच्या अवस्थेबद्दल माउली म्हणत आहे: ‘कृष्णाच्या ध्यानात मग्न झालेली एक विरहिणी बोलत आहे की शीतल चांदणेही आता मला प्रखर सूर्यप्रकाशाप्रमाणे दाह देत आहे. या विरहाग्नीला शमविण्यासाठी तुम्ही मला चंदनाचा लेप लावू नका वा पंख्याने गार वारा घालू नका. माझ्या हरिविण हे सर्व निरुपयोगी आहेत (१). माझ्या या दुःखाचे मूळ तुम्हाला कसे कळत नाही? सख्यांनो, आता माझे सर्व जीवन कृष्णमय झालेले आहे (२). त्यामुळे नंदकुमाराला सतत माझ्यासमोर आणल्याशिवाय आता माझे प्राण वाचणार नाहीत. श्री ज्ञानदेवांनाही विठ्ठल, गोविंद या नावांचा जप अमृत प्राशन केल्यासमान आहेत (३).’

सदर गोपीच्या मधुरभावात पूर्ण अध्यात्म भरलेले आहे असे म्हणण्याचे कारण म्हणजे भगवंतांशी भेट झाल्यावर ती आपल्या पंचेंद्रियांचे समाधान होईल असे म्हणत नाही तर माझे जाणारे प्राण परत येतील असे म्हणत आहे. हे प्रेम देहभावनेवर आधारीत नाही तर चैतन्याच्या पातळीवर आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये विश्वरुपाचे दर्शन झाल्यावर परम भक्‍त अर्जुनसुध्दा असे उद्गारतो की भगवंता तुझे चतुर्भुज रुप परत माझ्यासमोर पुढे येऊदे, नाहीतर जीव काय आता चैतन्यसुध्दा जायची वेळ आलेली आहे! समजा गोपिकेच्या मागणीला मान देऊन अचानक श्रीकृष्ण समोर आले तर ती काय करेल? तिची अवस्था काय करु आणि काय नको असे होऊन ती संपूर्णपणे भांबावून जाईल. श्री रामकृष्ण परमहंस एकदा कलकत्याला राहणाऱ्या दोन बहिणींच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या घरी गेले तर त्यातील एक बहीण आतल्या खोलीतच ‘आज माझ्या घरी प्रत्यक्ष ठाकुर आले आहेत’ असे म्हणून त्या अत्यानंदात नुसती बसून राहीली. त्या अत्युकट आनंदावेगाने पूर्ण बहरुन गेल्याने तिला खोलीबाहेर येऊन त्यांचे दर्शनसुध्दा घेता आले नाही, मग त्यांची सरबराई करणे दूरच राहीले! दुसरी बहीण श्री रामकृष्णांकडे तक्रार करु लागली की ‘बघा, सगळ्यांची सेवा करण्याची सर्व कामे मला एकटीलाच करावी लागत आहेत. बहीण असूनसुध्दा काही उपयोग नाही!’ अहो, सद्‍गुरु समोर आल्यावर आपले संसारिक देहभान हरपणे यापेक्षा अधिक उच्च अध्यात्मिक अवस्था असू शकेल काय? आणि अशी अवस्था व्हावी म्हणूनच सद्‍गुरुंचे स्मरण सतत केले पाहिजे. अभंगाच्या शेवटी माउली म्हणूनच असे म्हणत आहे की ‘विठ्ठल, गोविंद’ या नामांचा जप करणे म्हणजे आपले गमाविलेले अध्यात्मिक जीवन परत मिळण्याचे अमृत प्राशन करण्यासारखे आहे. हा अमृताचा सागर अखंड समोर असताना व्यावहारिक विश्वात मग्न राहण्याने आपणच आपल्या ओठांची वज्रमिठी घालून बसलो आहोत याला कोण काय करणार?

॥ हरि ॐ ॥

संत ज्ञानेश्वर विराणी ६


संत ज्ञानेश्वर विराणी / विरहिणी / विरहरत्ने ७ – कृष्णा सारखा कृष्ण आहे!

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥
सांवळिये बुंथी सांवळिया रुपें । सांवळिया स्वरुपें वेधियेलें ॥ १ ॥
काय करुंगे माये सांवळे न सोडी । इंद्रियां इंद्रियां जोडी एकतत्वें ॥ २ ॥
कैसे याचे तेज सांवळे अरुवार । कृष्णीं कृष्ण नीर सतेजपणे ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचे खुणे । सांवळेची होणे यासी ध्यातां ॥ ४ ॥

भगवंताचे वर्णन कसे करावे? शब्द जिथे पोहोचू शकत नाहीत त्या गोष्टीचे वर्णन करणे अशक्यप्राय आहे यात शंका नाही. परंतु जरा विचार केला तर आपण आपल्या आयुष्यात एकातरी गोष्टीचे पूर्ण वर्णन करु शकलो आहोत का? ‘चहा कसा झाला आहे?’ या प्रश्नाचे उत्तरसुध्दा आपण ‘छान’ या एका शब्दात देतो वा ‘नेहमीसारखा झाला आहे, का विचारतेस?!’ असा प्रतिप्रश्न करुन देत नाही! यातील गंमतीचा भाग जरी सोडला तरी मूळ मुद्दा यातून स्पष्ट होतो की अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टीचेसुध्दा आपण पूर्ण वर्णन करु शकत नाही. याचे कारण असे की ज्या आपल्या इंद्रियांद्वारे आपणास जगाचे ज्ञान होते त्यांची ग्रहणशक्‍ती फार मर्यादीत असल्याने आणि एकावेळी एकाच इंद्रियाद्वारे ज्ञान होत असल्याने आधी आपणास संपूर्ण जाणीव कधी होतच नाही. आणि त्यात स्वतःची शब्दसंपत्ती तोकडी असल्याने झालेल्या अपुऱ्या माहितीलासुध्दा शब्दांकित करणे आपल्या आवाक्याबाहेर असते. आणि त्यातून महत्वाची गोष्ट म्हणजे या जगात कुणाला एवढी सवड आहे की एखाद्या गोष्टीला संपूर्णरीत्या जाणावे आणि सांगावे? कामचलावू ज्ञान झाले की आपले पूर्ण समाधान होते. उदाहरणार्थ, सायकल कशी चालवावी हे कळले की आपले सायकलबद्दलची जिज्ञासा शमते. पडू न शकता तिच्यावर बसू शकण्यामागील शास्त्रीय सिध्दांत काय आहे आणि बसण्यासाठी नक्की कुठल्या अवयवांचा कसा उपयोग आपण करीत आहोत हे जाणून घ्यायला कोण उत्सुक आहे?! पण गंमत बघा की आयुष्यभर अर्धवट ज्ञानात सुख मानणारे असे आपण परमार्थात मात्र संपूर्ण ज्ञानाची अपेक्षा ठेवतो! भगवंत कसा आहे हे तुम्ही मला सांगा असा गुरुंजवळ हट्‍ट धरुन बसतो. कल्पना करा की जर आपण दररोज घडणाऱ्या सामान्य गोष्टींना स्वतःच्या जाणीवेने संपूर्ण समजू शकत नाही, तर भगवंत कसा आहे याचे ज्ञान दुसऱ्यांच्या अनुभवातून कसे मिळवू शकू? म्हणूनच भगवंताचे वर्णन वृक्षाची शाखा दाखवून त्याच्या पलिकडील आकाशातील अंधुकशी दिसणारी चंद्राची बारीकशी कोर निदर्शनास दाखविण्यासारखे सर्व संत करतात.

श्री रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या प्रिय शिष्यांनी अनेकदा त्याच्या अत्युच्च भावावस्थेचे वर्णन करण्याचा आग्रह केला होता. भक्‍तांवरील प्रेमाने ‘आज मी त्या अवस्थेत गेलो की जरुर सांगीन’ असे त्यांनी बरेचवेळा सांगितलेसुध्दा. परंतु त्या अवस्थेत पोहोचल्यावर ते संपूर्णरीत्या स्तब्ध व्हायचे. नंतर ते म्हणायचे की ‘मुलांनो, मी खरोखर मनापासून स्वतःला थोडे वेगळे ठेवून जे दिसत आहे त्याचे वर्णन करण्याचा प्रयत्‍न केला. परंतु जेव्हा समाधी लागते तेव्हा मुखातून शब्द उच्चारायला हवेत याची जाणीव व्हायला जरुरी असणारे देहभानच हरपते. मग कोण कुणाला काय सांगणार?’ नंतर ते म्हणायचे की ‘या जगात ज्या गोष्टींबद्दल बोलले गेले आहे त्या सर्व वस्तू आपल्या वाचेमुळे जणू ‘उष्ट्या’ झालेल्या आहेत. त्यांचा सोवळेपणा नष्ट झालेला आहे. या विश्वात संपूर्णरीत्या पवित्र गोष्ट एकच आहे. ती म्हणजे भगवंताशी एकरुप झाल्यावरची समाधीवस्था!’ या उच्चारांमधून ब्राह्मणाने ‘सोवळ्यात’ रहावे या नेहमी वापरण्यात येणाऱ्या शब्दांचा एक वेगळाच अर्थ लागतो! असो.

परंतु या वस्तुस्थितीतही आपल्या उपजत परमदयाळू स्वभावामुळे सर्व संतांनी आपापल्या परीने त्यांच्या इष्टदेवतेचे वर्णन करण्याचा प्रयत्‍न केलेला आहे असे दिसून येते. याचे कारण असे की ज्या भगवंताशी एकरुप झाल्याने त्यांना जिवापलिकडील आनंद प्राप्त झालेला असतो त्या आनंदाला सर्व जगाला वाटण्याचा त्यांचा प्रयत्‍न होय. वरील विरहिणीमध्येसुध्दा माउली आपल्या आराध्याचे वर्णन करीत आहेत असे दिसून येते. अभंगामध्ये श्री ज्ञानदेव महाराज असे म्हणत आहेत की ‘सांवळ्या रंगात बांधलेल्या सावळ्या रुपाच्या सांवळ्या आकृतीने माझे मन पूर्ण वेधून घेतले आहे (१). मैत्रिणींनो, आता मी काही केले तरी या सांवळ्या रुपाचा ध्यास काही सुटत नाही. माझी सर्व इंद्रिये या एकाच रुपाच्या चिंतन करण्याच्या प्रयत्‍नांत एकरुप झालेली आहेत (२). या सांवळ्या रुपाचे तेज सांवळेपणाने झळकत आहे! जणू काळ्या रंगाच्या डोहात माझा कृष्ण सावळ्या तेजाने चमकत आहे (३) ज्ञानदेवाला श्री निवृत्तींच्या कृपाप्रसादाने सांवळ्यात सामावून जाण्याचा ध्यास लागला आहे (४).’

ज्या माउलींनी श्री ज्ञानेश्वरीत अनेक नवीन शब्द निर्माण करुन आपल्या भावनांना स्पष्टरीत्या मांडले त्यांनासुध्दा आपल्या भावावस्थेतील सांवळ्याचे वर्णन करीत असताना ‘सांवळा’ याशिवाय दुसरा कुठलाही शब्द वापरावासा वाटला नाही यातच भगवंताचा अनिर्वाच्यपणा स्पष्ट होतो. बावन्न भाषांवर पूर्ण प्रभुत्व असलेल्या माउलींनाही ‘सावळा’ या शब्दाशिवाय दुसरा एकही शब्द त्यांच्या शब्दसंपत्तीमधून वापरावासा वाटला नाही हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. भगवान कृष्ण कृष्णरुप आहे याशिवाय माउली सांगू इच्छित नाही तर दुसरे कोण काय बोलणार? हीच गोष्ट अनंत काल चालू आहे. आपले वेदसुध्दा ‘हे नाही, ते नाही’ यापलिकडे भगवंताचे वर्णन करु शकले नाहीत. ख्रिश्चन धर्मातही अशी कथा आहे की साडे-तीन हजार वर्षांपूर्वी जेव्हा आपल्या योग्य अनुयायांना मार्गदर्शन मिळावे म्हणून मोझेसने सिनाई पर्वतावर जाऊन भगवंताची आराधना केली आणि देवाने त्याला एका झुडुपातील अग्नीरुपात दर्शन दिले व लोकांना उपदेश म्हणून ‘दहा आज्ञा ’ दिल्या. तेव्हा मोझेसने देवाला विचारले की ‘तूच मला भेटलास यावर लोकांचा विश्वास बसावा म्हणून मला तुझे वर्णन करावे लागेल. तर तू कसा आहेस म्हणून मी त्यांना सांगू?’ तेव्हा त्याला उत्तर मिळाले ‘मी माझ्यासारखा आहे हे त्यांना सांग!. अहो अनादीकाळापासून भगवंताचे वर्णन असेच होत आहे. परमार्थामध्ये दुसऱ्याच्या वर्णनाचा आधार घेऊन भगवंताशी भेट होत नाही तर सद्‍गुरुकृपेमुळे स्वतःला ध्यास लागल्यावर होते असे माउली आपणास अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगत आहे. माउली अभंगातून आपणास असे सांगत आहे की भगवंताचा ध्यास लागणे म्हणजेच गुरुकृपा झाली असे समजणे होय. या ध्यासानंतर स्वतःच्या पायावर उभे राहूनच भगवंतदर्शन घ्यायचे आहे. याकरीता जे पाठबळ लागते ते द्यायला आपले सद्‌गुरु समर्थ आहेतच!

॥ हरि ॐ ॥


विराणी ८ -सर्व सुखाचे मूळ

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥
त्रिभुवनींचे सुख पाहावया नयनीं । दिनरात्रीं धणी न पुरे माझी ॥ १ ॥
विटेवरी सांवळा पाहतां पैं डोळां । मन वेळोवेळां आठवितु ॥ २ ॥
सागरीं भरीतें दाटे तैसे मन नटे । वाट पाहों कोठें तुझी रया ॥ ३ ॥
बापरखुमादेविवरु पूर्ण प्रकाशला । कुमुदिनी विकासला तैसे जालें ॥ ४ ॥

या जगात वैविध्य ठासून भरलेले आहे. इथे कुणी श्रीमंत आहे तर त्याच्या एका बंधूला दोन वेळच्या खाण्याची ददात आहे. कोण आपल्या कुटुंबियांबरोबर रहात आहे तर आणखी कुणी नोकरीनिमित्त स्वकियांपासून दूर परदेशी जाऊन एकटा रहात आहे. येथील एक राजा आहे तर अनेक रंक आहेत आणि नैतिकतेचा पुतळा असलेल्यांचे शेजारी गुन्हेगार आहेत. परंतु या सर्व विभिन्नतेमध्ये एक समानता आहे. ती म्हणजे सर्वांची आपापल्या परीने जीवनात सुख शोधण्याची चाललेली धडपड. प्रत्येकजण आपली बुध्दी चालवून स्वतःला जे पटेल त्याप्रमाणे सुखी राहण्याचा प्रयत्‍न करीत आहे. भरपूर चावी दिलेल्या खेळण्याला जमिनीवर ठेवले की त्याच क्षणी जिकडे तोंड असेल तिकडे जोराने पळू लागते. त्याचप्रमाणे जन्मापूर्वीच आपल्या मनात स्वसुखाच्या आस्थेचा इतका ताण भरलेला आहे की जन्माला आलेल्या क्षणापासून आपण सुखाचा उपभोग घेण्यास सतत पळत आहे. पाठीवर जीवघेणे ओझे लादलेल्या गाढवासमोर एका काठीला गाजर टांगून ठेवतात आणि त्याच्या प्राप्तीच्या आशेत तो भरभर चालायला लागतो असे म्हणतात. त्याचप्रमाणे भूतकाळात मिळलेल्या सुखाला स्वाहा करुन आपले मन भविष्यातील आनंदाची तरतूद करण्यास वर्तमानकाळात आपणास नाना प्रकारे नाचविते. या सर्व गडबडीमध्ये आपण मूलभूत प्रश्न विचारायचे विसरतो. ते म्हणजे, या जगात इतक्या विविध प्रकारची सुखे भरुन ठेवलेली आहेत त्या सर्वांमध्ये काही समानता आहे का? की प्रत्येक सुख आपल्या स्वतंत्र पायावर उभे आहे? हे प्रश्न मूलभूत आहे असे म्हणण्याचे कारण असे की समजा सर्व सुखांचे मूळ एकच असले तर सूज्ञ मनुष्य त्या पायाला प्राप्त करण्याचा प्रयत्‍न करील. तलावावरील तरंगावर हेलकावे खाण्यापेक्षा खोल डुबकी मारुन शांत पाण्यात मासा राहतो तसे आपण एका मागे एक सुखांच्या शोधापेक्षा सर्व सुखांच्या मूळालाच कवटाळून बसू.

आपल्या मनात हे प्रश्न उद्भवतसुध्दा नाहीत याचे कारण दृष्य जगतातील उपरोनिर्दिष्ट वैविधता होय. ज्याप्रमाणे पत्यांची जादू करणारा मनुष्य आपले व्यवधान बोलण्यात गुंतवून हळूच दुसरीकडे हातचलाखी करतो त्याचप्रमाणे आपल्या नजरेसमोरील विविधता त्यांच्यामध्ये काही साम्य असेल या भावनेला उद्भवूदेखील देत नाही. कल्पना करा की कचेरीमधून दमून आल्यावर हसतमुख पत्‍नीच्या हातून मिळालेल्या गरम-गरम चहाच्या प्यालातील आनंद आणि ती माहेरी गेल्यावर शेजारणीशी खेळकरपणे मनसोक्‍त गप्पा मारण्यातील सुख आणि त्या दोघींना पूर्ण विसरुन भगवंताच्या उपासनेत संपूर्णपणे मग्न होण्यामधील मिळालेले समाधान यामध्ये काही समानता असू शकेल याची आपण कल्पनातरी करु शकतो का?! परंतु आपल्या जीवनातील सर्व सुखांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे प्रत्येक सुखी क्षण आपल्या मनाची अजून काही शोधण्याची धडपड थांबलेली असते तेव्हाच येतो.

जरा विचार केल्यावर आपल्या लक्षात येईल की जेव्हा केव्हा आपणास आनंद होतो तेव्हा त्या आधी ‘आता अजून काही हवे आहे’ ही भावना आपल्या मनातून गेलेली असते आणि आपले मन त्या स्तब्धतेमध्ये विलीन हो‍उन गेलेले असते. काय गंमत आहे बघा. जे मन सुख मिळविण्यासाठी आपणास नाना संकटातून नाचविते ते स्वतः कधीही सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही (कारण त्या प्रत्येकवेळी तो ‘मनोरुपी पटु’ फाटलेला असतो). मिठाची बाहुली अथांग सागराचा तळ शोधण्यास गेली असता स्वतःच्या अस्तित्वाच्या लोपामध्येच सत्य प्राप्त करते तशी ही गोष्ट आहे. मग परत स्वतंत्र अस्तित्व आल्यावर त्या बिचाऱ्या मनाचा सुखाचा शोध सुरु होणारच. कारण त्याने फक्‍त भूतकाळात मिळालेल्या सुखाची गोष्ट ऐकलेली असते, प्रत्यक्ष काहीच अनुभवलेले नसते! आता असे बघा की ज्यावेळी आपले मन नष्ट होते त्या प्रत्येकवेळी आपण भगवंतानजीक असतो. ही भगवंतप्राप्तीची व्याख्याच आहे असे समजा. म्हणूनच माउली आपल्या वरील अभंगामध्ये भगवंताच्या निर्गुण रुपाला ‘त्रिभुवनींचे सुख’ या नावाने पुकारत आहे. भगवंत म्हणजे केवळ सात्विक लोकांचे सुख नसून या सर्व जगातील यच्चयावत सुखांचा पाया तोच आहे हे ध्यानात घ्या. म्हणूनच संत असे म्हणतात की सर्व विश्व एकाच भगवंताच्या ध्यासात आहे.

वरील विरहिणीमध्ये माउली म्हणत आहे: ‘या त्रिभुवनातील सर्व सुखांचा पाया असलेल्या निर्गुण भगवंताला नयनांनी प्रत्यक्ष पाहण्यासाठी दिवसरात्र माझी आस्था फोफावत आहे (१). (पंढरपुरी) विटेवर उभा असलेल्या सांवळ्याला डोळा भरुन बघितल्याची आठवण मनात वारंवार येत आहे (२) पूर्ण भरलेल्या सागरालाही जलौघांनी पाणी आणावे असे वाटते त्याप्रमाणे तुझ्या आठवणींने पूर्ण झालेल्या मनाने मी वाट बघत आहे की तुझी मूर्ती कुठे दिसेल (३) (तुझ्या दर्शनाने) श्री ज्ञानदेवांना सुखाची पूर्ण प्राप्ती झाली आहे, आणि ज्याप्रमाणे रविउदयाबरोबर कमळ संपूर्णरीत्या विकसित होते त्याप्रमाणे मतीची स्थिती झाली आहे (४).’

आपल्या मनाची दोलायमान स्थिती जेव्हा निर्गुण भगवंताच्या सान्निध्याने नष्ट हो‍उन स्थिरता प्राप्त होते तेव्हा सुख मिळते. आणि त्यात सगुण रुपाची आस्था असणे म्हणजे पूर्ण भरलेल्या सागरामध्ये वर्षाऋतूतील ओसंडून वहात असलेल्या गंगेने आणलेले पाणी मिसळल्यासारखे होते. अशावेळी आपली मर्यादा न सोडता तो सागर अधिकच उचंबळून येतो आणि त्याचे रुप अधिकच भव्य होते. अगदी त्याचप्रमाणे विठ्ठलाच्या दर्शनाने संतांच्या हृदयाला भर येतो असे माउली म्हणत आहे! जसा सागर आधीच पूर्ण होता त्याचप्रमाणे संतही अनुसंधानात संपूर्णच असतात. आणि अशा स्वरुपानुसंधानात मग्न असलेल्या स्थितीत संतांच्या चित्ताचे अर्धवट उमलेले कमळ सुंदर असते यात शंकाच नाही. पण सगुण रुपाच्या ध्यासात ते जेव्हा संपूर्ण उमलते तेव्हा त्याचे सौंदर्य अधिकच बहरुन येते. श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे की ‘स्वतः साखर होण्यात मला आनंद वाटतोच पण ती साखर चाखण्यातसुध्दा कधी कधी रस वाटतो!’. अलंकापुरीत आत्मानंदात डुंबत असणाऱ्या माउलीला पंढरपुरला जाण्याची आस लागते ती कुठल्या कारणाने हे इथे स्पष्ट होत आहे असे वाटते.

॥ हरि ॐ ॥

संत ज्ञानेश्वर विराणी ८


विराणी ९ – करुणापर आळवणी

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥
रंगा येईवो ये रंगा येईवो ये । विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥ १ ॥
वैकुंठनिवासिनी वो जगत्रयजननी । तुझा वेधु ये मनी वो ॥ २ ॥
कटीं कर विराजित मुगुटरत्‍नजडित । पीतांबरु कासिया तैसा येई कां धावत ॥ ३ ॥
विश्वरुप विश्वंभरे कमळनयने कमळाकरे वो । तुझे ध्यान लागो बापरखुमादेविवरे वो ॥ ४ ॥

आपण जे बीज पेरु त्याचप्रमाणे पीक येते आणि हाच नियम आपल्या सर्व कर्मांनासुध्दा लागू होतो. आपल्या कर्मफलाचे रुप निव्वळ दृष्य कर्मांवर ठरत नसून केलेल्या कृतींमागे आपला हेतू कुठला होता यावर जास्त अवलंबून असतो. उदाहरणार्थ, एखाद्या कसायाने मरणास टेकलेल्या बोकडाचा जीव वाचवून त्याला पुष्ट केले असे सकृतदर्शनी सात्विक कर्म केले तरी त्यामागील हेतू नंतर त्याचे मांस विकून उदरभरण करण्याचाच असल्याने या वरकरणी सात्विक वाटणाऱ्या कर्मांचे फल तामसिकच होते, त्याला मोक्षपदास नेण्यास उपयुक्‍त होत नाही. या उदाहरणामध्ये एक सूक्ष्म गोष्ट दडलेली आहे ती आपण ध्यानात घेतली पाहिजे. ती म्हणजे वरील उदाहरणात कसायाला स्वहेतूची पूर्ण जाणीव असल्याने ‘मी किती पुण्य केले आहे’ असे तो स्वतःसुध्दा म्हणत नाही. परंतु समजा त्याचा ‘मी बोकडाच्या भल्यासाठीच हे सर्व करत आहे’ असा गैरसमज झाला असता तरीसुध्दा त्याचे कर्मफल बदलणार नाही! कारण त्याने काहीही म्हटले तरी सत्य परिस्थिती बदलत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपणास स्वतःच्या साधनेबद्दल कितीही चांगली समजूत असली तरी सत्यपरिस्थिती भिन्न असली (आणि ती भिन्न असतेच!) तर आपणास भगवंतचरणकमलप्राप्तीचे फल मिळत नाही. सर्वसाधारणपणे वस्तुस्थिती अशी असते की आपणही त्या कसायाप्रमाणेच कुठल्यातरी फलांकडे नजर ठेवून वरकरणी सात्विक दिसणारी पारमार्थिक साधना करीत असतो. याचे एक उदाहरण म्हणजे आपण सद्‌गुरुंना मान देतो हे खरे पण त्यांनी कसे वर्तन करावे याबद्दलच्या आपल्या मनातील अपेक्षांची जाणीव कितीजणांना असते? ज्यावेळी आपल्या गुरुंनी अमुक एक वर्तन कसे केले अशी शंका आपल्या मनात येते त्या प्रत्येकवेळी आपल्याच मनातील अपेक्षांचे दर्शन होत असते. आणि त्यांच्यामुळे आपणास साधनेचे फल न मिळता आपण भक्‍तीप्रेमाच्या अमृतवर्षावापासून कोरडेच राहतो.

तेव्हा लक्षात घ्या की आपण किती खडतर साधना केली यापेक्षा आपला साधनेचा हेतू किती पवित्र आहे यावर आपली प्रगती जास्त अवलंबून आहे. आपण साधनेला सुरुवात का केली याला फारसे महत्व नाही. परंतु सद्‍गुरुंबाबत ‘व्यावहारिक अडचणींवर मात करण्यासाठी एक समर्थ शक्‍ति’ हाच दृष्टीकोन आयुष्यभर ठेवला तर आपली साधनेतील प्रगती एका ठराविक पातळीच्या पुढे जाणार नाही यात शंका नाही.

काही साधक गुरुंच्या मदतीने आपल्या सुरुवातीच्या अडचणींवर मात करुन आता परत संसाराकडे बघायचे नाही असा सुनिश्चय करतात. परंतु अशा भाग्यवान साधकांमध्येही बहुतेकजण आपल्या गुरुंकडे ‘भूतकाळात अडचणींवर मात करण्यास मदत करणारे व भविष्यात भगवंतदर्शनाचा मार्ग दाखविणारे’ या कृतज्ञतायुक्‍त भावनेने बघत असतात. सकृतदर्शनी काहीच वावगे न दिसणाऱ्या या भावनेतूनसुध्दा वास्तविक आपण अजून संसारातून बाहेर आलेलो नाही हेच सिध्द होते हे लक्षात घ्या. त्यामुळे असे साधकही भगवंतभक्‍तिप्राप्तीपासून वंचित राहतात.

आता फारच विरळा साधक असे असतात की सद्‍गुरुंशी आपला संबंध कुठल्या निमित्ताने आला हे पूर्ण विसरुन त्यांच्याविषयीच्या निव्वळ प्रेमापोटी त्यांच्या सान्निध्यात राहतात. ज्याप्रमाणे न चुकता आणि विनाहेतू आपण मित्रांशी गप्पा मारायला दर संध्याकाळी नाक्यावर जातो त्याप्रमाणे ते आपली साधना नित्यपणे करतात. साधनेतून काय मिळाले, काय मिळणार आहे आहे वगैरे विचार त्यांच्या मनातसुध्दा येत नाहीत. हे साधक सद्‍गुरुंबद्दलच्या प्रेमात सतत न्हाऊन आपल्यातील सर्व मनोमळांना दूर सारतात आणि ध्येयाला सहजपणे गाठतात! श्रीसंत गोंदवलेकर महाराज म्हणायचे की ‘इथे इतके जण येतात, पण रामनामाची गोडी मनाला लावून घेऊन स्वतःचे सार्थक करुन घेणारे श्री ब्रह्मानंदांसारखे विरळाच आहेत!’ थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्या साधकांचा साधनेमागील हेतू प्रेमाशिवाय दुसरा नसतो त्यांना आणि त्यांनाच भगवंतभक्‍तीची प्राप्ती होते. कारण निर्हेतुक प्रेमामध्येच भगवंत आहे.

आपल्या मनात भगवंताबद्दलचे निर्मळ प्रेम उद्भवणे हीच खरी गुरुकृपा आहे. एकदा ही कृपा झाली की भक्‍त भगवंताची कशी आळवणि करतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माउलींची वरील विरहिणी आहे. या स्थितीसाठी भगवंताच्या येण्यातच आपले सर्वस्व आहे ही भावना जागृत हवी! वरील अभंगातून माउली म्हणत आहे की: ‘हे पांडुरंगा ये रे, पांडुरंगा ये. माझी विठाई, कृष्णाई (ये ये तू आता ये) (१). ज्यापासून या त्रिभुवनांची निर्मिती झालेली आहे आणि जो वैकुंठात रहात आहे, त्या तुझ्या रुपाचाच ध्यास या मनात भरलेला आहे (२). भरजरी पीतांबर नेसून, रत्‍नजडित मुकुट घालून कंबरेवर हात ठेवलेल्या रुपात जसा आहेस तसा धावत ये (३) ज्याने आपल्या रुपाने हे विश्व पूर्ण भरलेले आहे आणि म्हणून विश्वरुप झाला आहे त्याच्या कमळधारी रुपाच्या सुंदर नयनांच्या ध्यानात श्री ज्ञानदेवांना जीवनाचे सर्वस्व वाटू दे (हीच प्रार्थना आहे) (४).’

अहो, भगवंताबद्दल असे निर्मळ प्रेम असलेल्या साधकामध्ये आणि भगवंतात काय फरक असतो? ज्याक्षणी हे पवित्र प्रेम उद्भवते त्याचक्षणी तो आपल्यामध्ये आलेलाच आहे! म्हणूनच स्वामी विवेकानंद जेव्हा पहिल्यांदा श्री रामकृष्ण परमहंसांकडे गेले तेव्हा त्यांना आपला जिवलग भेटल्यासारखा आनंद झाला आणि ‘अरे, इतके दिवस तू कुठे होतास?’ असे म्हणून स्वामींच्या गळ्यात हात घालून त्यांनी अश्रू ढाळले! तसे बघायला गेल्यास श्री रामकृष्ण परमहंसांकडे अनेक साधक सदा यायचे. परंतु त्यांची सत्‍संगाची भूक त्यांच्या सहवासात भरुन निघायची नाही. ते म्हणायचे ‘मी इथे रत्‍न, माणके द्यायला बसलो आहे आणि माझ्याकडे हिग-जीरे विकत घेण्यात रस असणारेच येत आहेत!’ त्यातच श्रीकालीमातेने दृष्टांत देवून तुझे खरे शिष्य येणार आहेत हे दाखविलेले असल्याने त्यांची वाट बघण्यात ते अगदी कासावीस व्हायचे. संध्याकाळ झाली की दक्षिणेश्वर मंदिराच्या छतावर जाऊन आक्रोश करायचे की ‘अजून एक दिवस गेला पण अजून तुम्ही आला का नाहीत?’ श्री रामकृष्णांची त्यांच्या ‘आतल्या गोटातील’ भक्‍तांची अशी वाट म्हणजे बघणे भगवंताची वाट बघण्यासारखेच आहे यात शंका नाही. या पार्श्वभूमीवर जेव्हा स्वामी ठाकुरांना प्रथम भेटले तेव्हा त्यांना असा पराकोटीचा आनंद होणे साहजिकच आहे. अर्थात, स्वामींना या पार्श्वभूमीची काहीच कल्पना नसल्याने कुठल्या वेड्या माणसाकडे मी आलो आहे असेच वाटले! परंतु आपण बघितलेले आहेच की स्वामींना आपल्यामधील पवित्रतेची जाणीव नसली तरी ते सत्य बदलले नव्हते! त्या सत्याच्या प्रभावानेच श्री रामकृष्णांना हर्षाचा अत्यावेग झाला. सद्‍गुरु दिसताक्षणी असा आवेग ज्यांच्या मनात येतो त्यांची साधना फळास आली असे समजावे.

॥ हरि ॐ ॥

संत ज्ञानेश्वर विराणी ९


संत ज्ञानेश्वर विराणी १ संत ज्ञानेश्वर विराणी २ संत ज्ञानेश्वर विराणी ३ संत ज्ञानेश्वर विराणी ४ संत ज्ञानेश्वर विराणी ५ , ६, ७, ८, ९ समाप्त


ref: bhavtarang